
केप ऑफ गुड फिल्म्स यांच्या, ‘हेरा फेरी ३’ चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेतून बाबू भैया अर्थात परेश रावल यांच्या अचानक माघारीमुळे निर्माण झालेल्या वादाबाबत आणि त्यासंदर्भातील प्रसारमाध्यमांमधील बातम्यांबाबत उलट सुलट चर्चा सुरू असतानाच सह निर्माते आणि केप ऑफ गुड होप या निर्मिती संस्थेचे मालक अभिनेते अक्षय कुमार याने आता अभिनेते परेश रावल यांना २५ कोटींची नोटीस पाठवली आहे. दरम्यान अलीकडेच लल्लनटॉप या माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत प्रेस रावल यांनी याबाबतचे संकेत दिले होते.
‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट अक्षय कुमार यांच्या प्रोडक्शन हाऊससाठी आणि प्रेक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या चित्रपटाद्वारे अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या आयकॉनिक त्रिकुटाला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आणण्याची त्यांची योजना होती. मात्र, परेश रावल यांनी कोणतेही ठोस कारण न देता अचानक चित्रपटातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर १८ मे २०२५ रोजी स्पष्ट केले की, त्यांचा हा निर्णय सर्जनशील मतभेदांमुळे नाही आणि त्यांचा दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याबद्दल आदर आहे. तरीही, त्यांच्या माघारीमागील कारण अस्पष्ट राहिले आहे. या निर्णयामुळे चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेवर गंभीर परिणाम झाला असून, प्रोडक्शन हाऊसला मोठ्या आर्थिक नुकसानाला आणि वेळेच्या अपव्ययाला सामोरे जावे लागले आहे. यामुळे, केप ऑफ गुड फिल्म्सने परिनम लॉ असोसिएट्समार्फत परेश रावल यांना २५ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये करारभंग आणि गैरव्यावसायिक वर्तनामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मागण्यात आली आहे. जर सात दिवसांत ही मागणी पूर्ण झाली नाही, तर प्रोडक्शन हाऊस कायदेशीर कारवाई, अर्थात नागरी आणि फौजदारी कारवाई, करण्यास बांधील असेल.
सुनील शेट्टी आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी परेश रावल यांच्या या निर्णयाबाबत अनभिज्ञता व्यक्त केली आहे. सुनील शेट्टी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “परेश रावल यांच्याशिवाय ‘हेरा फेरी ३’ बनवणे शक्य नाही,” तर प्रियदर्शन यांनीही रावल यांनी त्यांच्याशी कोणताही संवाद साधला नसल्याचे नमूद केले.
दरम्यान हिंदी चित्रपट सृष्टीत mile stone ठरलेल्या या भूमिकेसाठी आता कुणाची निवड केली जाते, याबाबत चित्रपट रसिकांत उत्सुकता आहे.