
कोल्हापूर प्रतिनिधी –
करवीर राज्य संस्थापिका महाराणी ताराबाई साहेब आणि बुलंद सह्याद्री यांच्या पराक्रमाची विजयगाथा म्हणजे मराठ्यांचा इतिहास आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांनी केले. अखिल भारतीय मराठा महासंघ आणि राजर्षी शाहू सलोखा मंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री शिवराज्याभिषेक व्याख्यानमालेच्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाळ पाटणकर होते
यावेळी बोलताना डॉ. पवार पुढे म्हणाले की, पंचवीसहून अधिक वर्षे रणांगणावर छावणी टाकून राहिलेल्या औरंगजेब बादशहाला नामोहरम करून त्याला मराठ्यांनी याच मातीत गाडले, त्यासाठी मराठ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली शिवाय सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांनी मराठ्यांच्या प्रयत्नांना हातभार लावला. सासरे छत्रपती शिवाजी महाराज आणि वडील हंबीरराव मोहिते यांच्यापासून वारसा म्हणून आलेले बुद्धीच्यातुर्य आणि शौर्य यांची सांगड घालून ताराराणींनी मराठी देशातल्या मावळ्यांना एकत्र करून मराठी स्वराज्याचे रक्षण केले आणि संवर्धन केले. कधी नव्हे तो मराठा नर्मदा नदीच्या उत्तरेकडे पोहोचला याचे श्रेय ताराराणींच्या समशेरीला आहे. मराठा म्हणजे केवळ एका जातीपुरता मर्यादित विषय नसून अठरा पगड जातीतला बारा बलुतेदार समाजातला शौर्य गाजवणारा प्रत्येक माणूस मराठा होता.
पाहुण्यांचे स्वागत मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले, पाहुण्यांची ओळख कोल्हापूर पुरालेखागाराचे गणेशकुमार खोडके यांनी करून दिली, सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केले.
यावेळी वसुधा पवार, डी जी भास्कर, प्राचार्य इस्माईल पठाण आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक उघडा.