
कोल्हापूर (प्रतिनिधी) : महात्मा बसवण्णा यांना व्यापक पद्धतीने समजून घेतले पाहिजे. महात्मा बसवण्णा मानवमुक्तीचा क्रांतिकारी हुंकार आहेत. महात्मा बसवण्णा यांच्यावर मराठी भाषिकांनी अन्याय केला आहे. त्यांचा जातीअंताचा विचार सर्वांनी समजून घेतला पाहिजे. त्यांच्या वचनाचाही अभ्यास केला पाहिजे. सध्याच्या काळात महात्मा बसवण्णा यांचे मानवतावादी व क्रांतिकारी विचार समजून घेणे गरजेचे असे प्रतिपादन कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी केले.
ते निर्मिती प्रकाशन, प्रकाशित सुप्रसिद्ध साहित्यिक आणि विचारवंत डॉ. विश्वास सुतार लिखित महात्मा बसवण्णा : जीवन आणि संघर्ष या महत्त्वपूर्ण वैचारिक ग्रंथाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी बोलत होते.
लेखक डॉ. विश्वास सुतार यांनी ग्रंथ लेखनामागील भूमिका स्पष्ट केली. महात्मा बसवण्णा यांचे ऐतिहासिक कार्यकर्तृत्व व जीवन संघर्ष मांडणारा, जातीअंताची भूमिका घेऊन मानवतावाद जोपासणारा आणि त्यांच्या मानवी मूल्यांची आधुनिकता प्रस्तुत करणारा हा ग्रंथ असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण म्हणाले, जात गडद होण्याच्या काळात महात्मा बसवण्णा यांचे विचार महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यांचे तत्त्वज्ञान दिशादर्शक होते. सामान्य माणसाच्या बाजूने उभी राहणारी त्यांची भूमिका मानवी समाज समृद्ध करणारी होती. त्यांचा समतावादी व विवेकवादी विचार आजही समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
प्रमुख वक्ते एम. आर. पाटील म्हणाले, महात्मा बसवण्णा मानवतावादी होते. त्यांचा जीवन संघर्ष मानवी प्रगतीसाठी होता. आजच्या धार्मिक उन्मादाच्या काळात महात्मा बसवण्णा यांचा माणूसकेंद्री विचार महत्त्वाचा ठरतो.
यावेळी प्रकाशक अनिल म्हमाने, महाराष्ट्र राज्य लिंगायत संघर्ष समितीच्या कार्याध्यक्षा सरला पाटील, प्रकाशिका डॉ. शोभा चाळके यांची भाषणे झाली.
ॲड. करुणा विमल, डॉ. गिरीश मोरे, मिलिंद यादव, डॉ. प्रविण चौगुले, प्रा. टी. के. सरगर, विश्वासराव तरटे यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचलन यश आंबोळे यांनी केले तर आभार अंतिमा कोल्हापूरकर यांनी मानले.